वाहतूक कोंडी मुक्त पुणेकरांसाठी पोलीस आयुक्त ‘बीआरटी’ मार्ग बंद करण्यासाठी थेट महापालिका आयुक्तांशी भिडले
वाहतूक कोंडी मुक्त पुणेकरांसाठी पोलीस आयुक्तांचा सल्ला
पुणे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालावी. पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडे केली होती. मात्र, ही मागणी जिव्हारी लागलेल्या पोलीस आयुक्तांनी पालिकेला सल्ला दिला आहे. “शहरातील वाहतूक कोंडी कमी करायची, असेल तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा. अनावश्यक सायकल ट्रॅक काढून टाकावेत,’ असे पत्रच पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठवले आहे.
नगर रस्ता, सातारा रस्ता तसेच सोलापूर रस्त्यावरील बीआरटी बंद करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. शहरात दिवाळीच्या आठवडाभर आधी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ऐन दिवाळीतही हीच स्थिती होती. त्यावरून कोंडी फोडण्यासाठी या दोन्ही विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची मागणी केली होती. मात्र, पालिकेने दिलेल्या पत्र जिव्हारी लागलेल्या पोलीस यंत्रणेकडून आधी शहरातील 24 रस्त्यांवर खड्डयांचे आणि नंतर आता बीआरटी मार्ग आणि सायकल ट्रॅक मुळे कोंडी होत असल्याचे सांगत पुन्हा पालिकेवर खापर फोडले आहे.
पोलीस आयुक्तांचे पत्र पोलीस आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार, “नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि सातारा रस्त्यावर महानगरपालिकेने बी.आर.टी. योजना राबवली आहे. यात नगर रस्ता हा राज्य मार्ग, सोलापूर आणि सातारा रस्ता है राष्ट्रीय महामार्ग आहेत. बाहेरील जिल्ह्यांतून मुंबई, नगर, सोलापूर, सातारा या ठिकाणी जाणारी वाहने पुणे शहरातून याच मार्गावरून जातात. या मार्गावर जड वाहनांची वाहतूकही अधिक आहे. या सर्व मार्गांवर बी.आर.टी. असल्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग हा फक्त पीएमपीसाठीच वापरला जातो.
उर्वरित रस्त्यावर वाहतुकीचा ताण येऊन वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. बी. आर. टी. मार्गातून पीएमपी सोबतच इतर वाहनेही जातात, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते आहे. तसेच बी.आर.टी. थांबे हे रस्त्याच्या मध्यभागी असल्याने प्रवाशांना रस्ता ओलांडून जावे लागते. त्यावेळी पादचाऱ्यांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळेही अपघात वाढत आहेत. पुणे शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक करण्यात येतो. पण, बऱ्याच ठिकाणी सायकल ट्रॅकचा वापर होत नाही.. त्यामुळे सर्व बीआरटी मार्ग बंद केल्यास तसेच सायकल ट्रॅक काढल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.’
या सगळ्या प्रकरणात पुणेकर मात्र वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आपसातील वाद बाजूला ठेवून पुणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी उपाययोजना करून आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे अशी भावना पुणे शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.



